नागभीड तालुक्यात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिकांचे हाल, प्रशासन झोपेत?
नागभीड, विशेष प्रतिनिधी : बाळकृष्ण उंबरकर : नागभीड तालुक्यातील विविध ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच शेतकरी बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवखळा ते बोथली, चिखलपरसोडी ते विलम, टेकरी ते कोल्हारी आणि मौशी ते टेकरी या प्रमुख मार्गांवरील डांबर व गिट्टी उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यांवरून प्रवास करणे धोकादायक ठरत असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासोबतच मौशी उचली, मौशी टेकरी आणि टेकरी-कोल्हारी या तीन नाल्यांवर मोठ्या पुलांचे बांधकाम करण्याचीही मागणी पुढे आली आहे. या संदर्भात ढोरपा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बंडूभाऊ उंबरकर यांनी आमदार बंटीभाऊ भांगडिया तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नागभीड येथील उपविभागीय अभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
