व्यक्तिमत्व विकास हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा मार्ग – सतीश मेश्राम
नागभीड : जनता शिक्षण संस्था, नागभीड संचलित जनता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थिनींसाठी व्यक्तिमत्व विकास व इंग्रजी विषयावर आधारित विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेची संकल्पना इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका रूपाली पाथोडे यांनी मांडली होती.
ग्रामीण भागातून अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानासोबत आत्मविश्वास वाढवणे, एकविसाव्या शतकातील स्पर्धांची जाणीव करून देणे, आचरण, देहबोली आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवणे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेसाठी सहाय्यक शिक्षक सतीश मेश्राम यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना स्पष्ट करताना स्व-ओळख, स्मार्ट वर्तन, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, करिअरच्या विविध संधी तसेच आधुनिक युगातील आव्हानांना सामोरे जाताना इंग्रजी भाषेचे महत्त्व या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनात व्यक्तिमत्वाची योग्य जडणघडण हीच यशाची गुरुकिल्ली ठरते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. मेश्राम उपस्थित होत्या. यावेळी रूपाली पाथोडे, लिनता टिकले तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली पाथोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लिनता टिकले यांनी केले.


