जोगापूर यात्रे संबंधाने घेतलेल्या नियोजन सभेत टाकलेली अट भक्तांच्या भावना दुखावणारी बाब - माजी आमदार सुदर्शन निमकर
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
तालुक्यातील प्रसिध्द जागृत देवस्थान व नवसाला पावणारा मारोती म्हणून जोगापूरचे मंदीर प्रसिध्द आहे . या मंदीरात गेल्या अनेक पिढ्यांपासून राजुरा वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या जोगापूर मंदिर परीसरात मार्गशिर्ष महीन्यात यात्रा भरत असते व वर्षभर सुध्दा अनेक भक्त दर्शनासाठी जात असतात .
मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीरामध्ये यात्रेकरीता मनाई केली होती व त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून भरणारी यात्रा वन विभागाने बंद केली होती. व त्यानंतर वनविभागाकडून वनपर्यटन म्हणून मोठया थाटामाटात उद्घाटन करुण जंगल सफारी सुरु करण्यात आली.
मात्र जंगल सफारी करीता परीसरातील नागरीकांनी अल्पावधितच पाठ फिरविल्यामुळे या सफारीचा फज्जा उडाला मुळात जंगल सफारी बंदच होती. परंतु मंदीरामध्ये दर्शनाला जाणाऱ्या भाविक भक्तांना जंगल सफारीच्या नावाखाली पाचशे रुपये घेऊन भक्तांकडून वसुली केल्या जात होती ही सत्य परीस्थिती असून एक प्रकारे श्रध्दाळू भक्तांकडून दर्शनाचे शुल्क घेण्याचा प्रकार सुरु होता.
यासंबंधाने विरुर येथे ( दि १४ ) राज्याचे वन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार दौऱ्यावर आले असता परीसरातील भक्तांनी त्यांची भेट घेऊन बंद केलेली यात्रा सुरु करावी व घेण्यात येणारे पाचशे रुपये शुल्क बंद करण्यात यावे अशी मागणी केली. त्यावरुन मंत्री मुनगंटीवार यांनी यात्रा सुरु करण्याचे व शुल्क न घेण्याचे निर्देश दिले व तसा आदेश सुध्दा निर्गमित करण्यात आला.
यासंबंधाने उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांनी यात्रेच्या नियोजनासंदर्भात राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार संजय धोटे यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यासमवेत ( दि १६ ) वनकुटी येथे आयोजित केलेल्या बैठकीत टाकलेल्या अटीमध्ये भक्तांना मंदीर परीसरात स्वयंपाक करण्यास बंदी राहील अशी अट आहे.
ही अट हिंदू संस्कृती नुसार धार्मिक भावना दुखावणारी आहे . कारण हिंदू संस्कृतीमध्ये पुजा आर्चना केल्यानंतरच देवाला भोजनाचा नैवद्य ठेवण्याची प्रथा आहे. जर मंदिर परीसरात स्वयंपाक करण्यावरच बंदीची अट असेल तर भोजनाचा नैवद्य ठेवता येणार नाही. मुळात हा प्रकारच जत्रा बंद करण्याचा असल्याचा आरोप माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केला आहे.
नियोजनाच्या बैठकीमध्ये अशा प्रकारच्या जाचक अटी घालण्याचा अधिकार वन अधिकाऱ्यांना कुणी दिला असा सुध्दा सवाल माजी आमदार निमकर यांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी अशा जाचक अटीला संमती कशी दर्शविली अशी भक्तांमध्ये सुद्धा चर्चा असून अशा प्रकारच्या अटी लादुन भक्तांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार केल्यास भक्तांकडून जन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .

