Top News

स्थानिकांच्या जमिनीवर उद्योग, रोजगारातही स्थानिकांना प्राधान्य द्या..... शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर यांचे उद्योगमंत्र्यांना निवेदन



चंद्रपूर : कोनसरी, हेडरी आणि घुग्घुस परिसरात औद्योगिक प्रकल्पांचा विस्तार होत असताना स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. स्थानिकांच्या जमिनीवर उद्योग उभे राहत असतील, तर त्या उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी देताना स्थानिक युवकांना प्रथम प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांना निवेदन दिले.

औद्योगिक प्रकल्पांमधील भरती प्रक्रियेत स्थानिक पात्र युवकांना प्राधान्य देण्याबरोबरच प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्पबाधित कुटुंबातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, अशी मागणी मुऱ्हेकर यांनी निवेदनातून केली आहे.

स्थानिक रोजगाराचा प्रश्न केवळ कायमस्वरूपी नोकऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता कंत्राटी कामे, तांत्रिक सेवा, सुरक्षा, वाहतूक, देखभाल तसेच इतर पूरक व्यवसायांमध्येही स्थानिकांना संधी देण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.


कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी

उद्योगांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाचा आढावा घेऊन त्यानुसार परिसरातील युवकांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण केंद्रे आणि रोजगार मेळावे आयोजित करावेत. आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन स्थानिक युवकांना उद्योगांसाठी रोजगारक्षम बनवावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, उद्योगांच्या सीएसआर निधीतून परिसरातील गावांमध्ये पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, मूलभूत सुविधा आणि कौशल्यविकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.


सात दिवसांत कृती आराखड्याची मागणी

स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर उद्योग विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित उद्योग व्यवस्थापनाची संयुक्त बैठक घेऊन ठोस व कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. हा आराखडा सात दिवसांत निश्चित करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी, अशी मागणी योगेश मुऱ्हेकर यांनी केली आहे.

“स्थानिकांच्या भूमीत उद्योगांचा विस्तार होत असेल, तर त्या विकासाचा पहिला लाभ स्थानिक युवकांना रोजगाराच्या माध्यमातून आणि स्थानिक गावांना विकासाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. स्थानिकांच्या हक्काच्या रोजगाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,” अशी ठाम भूमिका मुऱ्हेकर यांनी व्यक्त केली.

स्थानिकांच्या जमिनी, त्याग आणि रोजगार यांचा योग्य समतोल साधूनच औद्योगिक विकास झाला पाहिजे, असेही शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेने स्पष्ट केले आहे.

Previous Post Next Post