भाजप आक्रमक ; आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला हवा
(विदर्भ माझा न्युज 24 मुख्य उपसंपादक)रोहीत लोनारे, मुंबईः- मुंबई मेट्रो ३चं कांजूरमार्ग येथे होणाऱ्या कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपनं ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. तर, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे
मुंबई मेट्रो- ३चे कारशेड कांजूरमार्गमध्ये उभारण्यासाठी १०२ एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर, त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळं भाजपनं हाच मुद्दा पकडत ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले आहेत. तर, आदित्य ठाकरे यांनाही लक्ष्य केलं आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. 'ठाकरे सरकारला मेट्रो कारशेड जागा अधिग्रहणाचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागायला हवी. ज्यांच्यामुळं अतिरिक्त खर्च वाढणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पाला उशीरही होणार आहे. आदित्य ठाकरेंनीही राजीनामा दिला पाहिजे,' अशी मागणी त्यांनी केलं आहे.
'न्यायालयाने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. पुढील वाटचाल ठरवण्यासाठी आम्ही न्यायालयाच्या आदेशाची लिखीत सविस्तर आदेशाची वाट पाहत आहोत. मेट्रो ३ सोबतच ६, ४ आणि १४ साठी ही जमीन महत्त्वाची आहे. यामुळं सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचणार आहेत तर, १ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे,' असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

