हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना हवामान बदलांशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हवामानातील अनिश्चितता आणि एलनिनोच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे उत्पादन शाश्वत ठेवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये ग्राम कृषी विकास समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांसाठी उपयुक्त असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा १०० टक्के अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात प्रात्यक्षिकांचे आयोजन
चंद्रपूर जिल्ह्यात प्रकल्पांतर्गत 18 ते 23 मे आणि 25 ते 30 मे 2026 या कालावधीत टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अभियानांतर्गत दिली जाणारी माहिती
या हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियानांतर्गत शेतकऱ्यांना विविध आधुनिक आणि सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :
- रुद व रंबे (बेड) तयार करणे
- टोकन पद्धतीने लागवड
- शून्य मशागत पद्धतीचा अवलंब
- आंतरपीक पद्धती
- बियाणे उगवण क्षमता चाचणी
- बीज प्रक्रिया
- सापळा पिकांची लागवड
- निंबोळी व दशपर्णी अर्क तयार करणे
- जीवामृत, बिजामृत आणि घन जीवामृत निर्मिती
- पक्षी तांबे व चिकट सापळ्यांचा वापर
- ट्रायकोगार्डचा वापर
- एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब
यापूर्वीही राबविण्यात आले अभियान
यापूर्वी 20 ते 30 एप्रिल, 4 ते 8 मे आणि 11 ते 16 मे 2026 या कालावधीतही हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान राबविण्यात आले होते.
सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात या अभियानात प्रत्यक्ष सहभागी व्हावे..
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा :
सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, समूह सहाय्यक किंवा कृषी ताई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर यांनी केले आहे.
