आज कापेश्वर येथे धरण विरोधी संघर्ष समितीची महत्वाची बैठक
आर्णी (ता. प्र.) हिरासिंग राठोड :: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पात कोणालाही न बुडवता, कोणाचेही विस्थापन न करता जर पाणी मिळत असेल तर त्या पर्यायाचा विचार करण्याचे आदेश मुंबई येथे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती सोबत पार पडलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व ह्या प्रकल्याचे सुरू असलेले सर्व प्रकारचे काम थांबविण्याच्या सुचनाही दिल्या होत्या परंतु प्रत्यक्षात निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम थांबलेले नाही.
हरित लवाद पुणे व औरंगाबाद उच्च न्यायालय येथे याचिका प्रलंबित असतानाही पाटबंधारे विभाग कामाची घाई करीत आहे तसेच अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला असून हा प्रकल्प नको त्याऐवजी साखळी बंधारे बांधून पीण्याच्या पाण्याची व सिंचनाची व्यवस्था करावी ही समितीची प्रमुख मागणी आहे.
या मागणीला उपमुख्यमंत्री यांनी 9 जुलै 2024 च्या मुंबई येथील बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश दिले असतानाही प्रकल्पाचे काम सुरू करण्यामागे कुठला उद्देश आहे हे कळायला मार्ग नाही असे धरण विरोधी संघर्ष समिती ने माचा प्रतिनिधी सह बोलताना म्हटले आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अठरा गावात पाटबंधारे विभाग व भुमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाऊन तेथील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे, शेतीची मोजणी करणे, ग्रामसभेचे ठराव प्रकल्पाच्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न करणे तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाचे मुख्य स्थळ खंबाळा येथे हेडक्वार्टरचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने व राज्य सरकार निम्न पैनगंगा प्रकल्प थांबवण्याच्या दृष्टीने कोणतेही पावले उचलत नाही हे लक्षात येताच निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने आज 6 आक्टोंबर रविवार रोजी दुपारी 1 वाजता विदर्भातील कापेश्वर येथील कपिलेश्वरच्या मंदिरावर धरण विरोधी संघर्ष समितीच्यावतीने बुडीत क्षेत्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर बांधवांची व कार्यकर्त्यांची अतिशय महत्त्वाची व तातडीची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला बुडीत क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव व यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे , सचिव विजय पाटील राऊत व बंडूसिंग नाईक, कायदेशीर सल्लागार एडवोकेट बालाजी येरावार व बाबु फारूकी, डॉ. बाबा डाखोरे, डॉ.सुप्रिया गावंडे, विजय पाझारे, गुलाब मेश्राम, निलेश कुमरे, शेषराव मुनेश्वर, डॉ .बबन मोरे,विजय समगिर, सुरेश महल्ले, कैलास उकले, उत्तम कांबळे, उत्तम मिरासे,भगवतीप्रसाद तितरे इत्यादींनी केले आहे.
