नागपूर, ९ जून: वाढत्या वीज बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, बिलातील ‘वहन आकार’ (Transmission Charge) हा नव्या वादाचा विषय ठरत आहे. विदर्भात राज्यातील सुमारे ७१ टक्के वीज निर्मिती होत असताना, त्याच भागातील ग्राहकांकडून प्रतियुनिट १.१६ रुपये वहन आकार आकारला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
विदर्भात वीज निर्मिती, तरीही वहन आकाराचा भुर्दंड
वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वहन आकार आकारला जातो. मात्र, विदर्भातील वीजनिर्मिती केंद्रांमधून निर्माण होणारी वीज मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाठवली जाते. त्यामुळे वीज उत्पादनाचा मुख्य भार सहन करणाऱ्या विदर्भातील नागरिकांनीच वहन आकार का भरावा, असा प्रश्न विदर्भवादी संघटना, अर्थतज्ज्ञ आणि अभ्यासक उपस्थित करत आहेत.
वीज बिलात वाढ
महावितरणकडून प्रतियुनिट १.१६ रुपये वहन आकार आकारला जात आहे. ज्या ग्राहकांचे वीज बिल सुमारे २,१०० रुपये आले आहे, त्यांना तब्बल ३०० रुपयांपर्यंत वहन आकार भरावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. विजेचा वापर जितका अधिक, तितका वहन आकार वाढत असल्याने नागरिकांच्या बिलाचा आकडा फुगत आहे.
वाढीव बिलावर सुरक्षा ठेवही वसूल
उन्हाळ्यात एसी, कूलर आणि इतर उपकरणांच्या वाढलेल्या वापरामुळे वीज बिल आधीच वाढलेले असते. त्यात वहन आकाराची भर पडत आहे. याशिवाय महावितरण उन्हाळ्यातील वाढीव सरासरी बिलाच्या आधारे सिक्युरिटी डिपॉझिट (सुरक्षा ठेव) देखील वसूल करत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी वाढत आहे.
“विदर्भावर दुहेरी अन्याय” – मुकेश मासूरकर
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासूरकर यांनी सांगितले की, “विदर्भात वीज निर्मिती होते, प्रदूषणही येथील नागरिकांना सहन करावे लागते. त्यानंतरही वहन आकार भरावा लागणे हा अन्याय आहे. पश्चिम महाराष्ट्रात वीज पाठवली जात असताना त्याचा आर्थिक भार विदर्भातील जनतेवर टाकणे योग्य नाही.”
“५ हजार मेगावॅट वीज बाहेर पाठवली जाते” – गुलाबराव धांडे
वीज प्रश्नाचे अभ्यासक आणि विदर्भवादी नेते गुलाबराव धांडे यांनी दावा केला की, राज्यात निर्माण होणाऱ्या सुमारे ७,२०० मेगावॅट विजेपैकी केवळ २,२०० मेगावॅट वीज विदर्भात वापरली जाते, तर उर्वरित ५,००० मेगावॅट वीज पश्चिम महाराष्ट्रात पाठवली जाते. अशा परिस्थितीत वहन आकाराच्या नावाखाली विदर्भातील ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
नागरिकांकडून पुनर्विचाराची मागणी
वाढत्या वीज बिलांमुळे आधीच त्रस्त असलेल्या ग्राहकांनी आता वहन आकाराच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. विदर्भात वीज निर्मिती होत असल्याने येथील ग्राहकांना वहन आकारात सवलत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
