गारपिटीने मिरची पिकाचे अतोनात नुकसान, शासनाने नुकसाभरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी.......
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
गेल्या तीन चार दिवसापासून पावसाने चांगलाच कहर केला असून बळीराजा मेटाकुटीस आला आहे. शेतातील उभ्या पिकाचे पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. आज दुपारी वारा, पाऊस व गारपीट झाल्याने धानोरा, कविटपेठ शेतशिवरातील मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
वर्धा नदीला पावसाळ्यात आलेल्या पाच पुरामुळे खरीप पिके गेली. यामुळे परिसरातील शेतकरी अगोदरच पुरता हतबल झाला आहे. पावसाळा गेल्यानंतर परत कर्ज काढून शेतकऱ्यांनी शेत पेरले. यात मिरची, गहू, हरभरा, ज्वारी हि पिके घेतली. बऱ्याच शेतकऱ्यांची मिरची शेतात आहे. मिरची पिकाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार होता. मात्र अवकाळी पाऊस, वारा व झालेल्या गारपिटीने मिरचीचे उभे पीक वाकून गेले असून झाडाची मिरची पूर्ण खाली गळाली. यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्याने संकट उभे झाले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा वर निसर्ग कोपला आहे. अशा परिस्थितीत शासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली जात आहे.
"पुरामुळे खरीप पिके हातून गेली. त्यानंतर कर्ज काढून मिरचीचे पीक घेतले. मात्र वारा, पाऊस व गारपिटीने मिरची पिकाचे अतोनात नुकसान झाले असून पुन्हा समोर कर्जाचा डोंगर उभा झाला आहे."
- सुनिल बोबाटे, शेतकरी कविटपेठ

