नागभीडमध्ये देशभक्तीचा जल्लोष! – तिरंगा यात्रा आणि भव्य बाईक रॅलीने ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागभीड : केंद्र शासनाच्या आदेशानुसार दि. २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत देशभरात तीन टप्प्यांत राबविण्यात येत असलेल्या “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” या विशेष अभियानाला नागभीड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता, मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद नागभीड यांच्या मार्गदर्शनाखाली व न.प. नागभीड क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या यात्रेत विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन “भारत माता की जय” व “वंदे मातरम”च्या घोषणांनी वातावरण दणाणून टाकले.
यानंतर सकाळी ११.०० वाजता शहरातील माजी सैनिक, प्रतिष्ठित नागरिक, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, तहसील कार्यालय कर्मचारी, पोलीस विभाग, तसेच न.प. अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंगा फडकवलेल्या शेकडो बाईकस्वारांनी शहराच्या मुख्य रस्त्यांवरून स्वाभिमानाने फेरी काढत देशभक्तीचा संदेश दिला.
या उपक्रमांमुळे नागभीडच्या रस्त्यांवर देशभक्तीचे अनोखे रंग खुलले. नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सहभागींचे जल्लोषात स्वागत केले. “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” या मोहिमेच्या यशासाठी शहरवासीयांनी एकजुटीने पाऊल टाकल्याचे या उपक्रमातून दिसून आले.



