Top News

Police baton charge Maratha protesters; Massive stone pelting, police firing in the air.....

मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; मोठ्या प्रमाणात दगडफेक, पोलिसांकडून हवेत गोळीबार.....



   विदर्भ माझा न्युज 24 - जालना  

जालन्यातील सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी हवेत गोळीबार देखील केला.

अंतरावाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांकडून आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनस्थळी दगडफेक झाली त्यानंतर पोलिसांन तर्फे हवेत गोळीबार करण्यात आला.



गेल्या २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. पण त्याला विरोध झाल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आले. तर आंदोलकांनी दगडफेक केली. त्यानंतर आक्रमक आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी आधल्या रात्रीच आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो हाणून पाडण्यात आला होता.



आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत १० ते १२ पोलिस जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर काही वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. या लाठीचार्ज नंतर बीड बंदची हाक देण्यात आल्याचे वृत्त समोर आहे. मात्र अद्याप बंद बाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

संभाजीराजे छत्रपती यांची आक्रमक प्रतिक्रिया

अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला व शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्र्यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल.

अशोक चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सराटी अंतरवालीअशोक चव्हाण यांनी दिलेली प्रतिक्रिया, ता.अंबड, जि. जालना येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हीडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो.

मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे.

मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे.

Previous Post Next Post