दोन दिवसांनपासुन रखरखत्या उन्हात आदिवासींचे रास्ता रोको व ठीय्या आंदोलन सुरुच.....
उन्हामुळे आंदोलनातील दोन महिलांची प्रकृती खालावली....त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात केले दाखल....
आदिवासी आंदोलनाची शासन दरबारी दखलच नाही?
पालकमंत्र्यांची चुप्पी काय दर्शविते? आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता!
विदर्भ माझा न्युज 24 - पोंभुर्णा
मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान 43.6 अंश होते. अंगाची लाही लाही करणाऱ्या या तापमानात हजारो आदिवासींनी रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरात हे रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन 2 दिवसांनपासुन सुरू आहे.
रखरखत्या उन्हामुळे आंदोलनातील दोन महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करिष्मा कुसराम, अर्चना कुळमेथे असे प्रकृती खालावलेल्या महिलांची नाव आहे.या घटनेनंतर हे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सेटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी आदिवासींनी हे आंदोलन सुरू केले आहे.
मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आदिवासी ठाम आहेत. या आंदोलनामुळे पोंभूर्णा-मूल आणि गोंडपिंपरी-मूल अशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मंगळवारची अख्खी रात्र आंदोलनकर्त्यांनी जागून काढली असून बुधवारी पहाटेपासून आंदोलनाला परत सुरुवात झाली आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील आदिवासी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
तसेच दिवसभरात वाढत्या तापमानामुळे आणि रखरखत्या उन्हामुळे दोन महिलांची प्रकृती खालवली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने कुठलीच खबरदारी घेतली नसल्याने या आंदोलनातील अनेकांची प्रकृती हालावणार हे नाकारता येत नाही. आदिवासी जनतेच्या विश्वासावर राजकारणाची पोळी शेकणाऱ्या राजकारण्यांनी आणि पालकमंत्र्यांनी मूळ निवासी असलेल्या आदीवासी जनतेची मागणी लक्षात घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी भूमिका आंदोलन करत्यांनी घेतलेली आहे. आता पालकमंत्री या आंदोलनाची दखल घेत काही तोडगा काढतील का? की फक्त बघायची भुमीका घेतील? राज्य सरकार या आंदोलनाकडे जातीने लक्ष देवून मुळनीवासी आदीवासी बांधवांच्या मागण्या पुर्ण करतील का?


