पावसाचे बदलणार रूप ! पंजाबराव डख यांचा हवामानाचा अचूक अंदाज

पावसाचे बदलणार रूप ! पंजाबराव डख यांचा हवामानाचा अचूक अंदाज






नागपूर :: गेल्या काही दिवसापासून मान्सून रखडल्याच्या आपण बातम्या ऐकल्या किंवा वाचल्या असतील व मे महिन्यापासून पूर्व मोसमी पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली व सगळीकडे जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आणि त्यानंतर मात्र मान्सूनचे आगमन देखील वेळेआधी झाले व त्यामुळे देखील राज्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. त्यानंतरच्या कालावधीत मात्र मान्सून रखडला आणि मान्सूनची प्रगती किंवा मान्सूनचा वेग हवा तितका राहू शकला नाही व त्यामुळे राज्यांमध्ये पावसाने उघडीप दिली होती.

या सगळ्या कारणामुळे शेतकरी वर्गामध्ये मात्र पेरणीच्या संदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता जर आपण हवामान खात्याचा अंदाज बघितला तर मान्सून परत एकदा सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागांमध्ये आता पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून पेरणीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत असून हवामान विभागाचा अंदाज जर बघितला तर त्यांच्यानुसार 18 ते 20 जून पर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल 15 जून रोजी ताजा हवामान अंदाज वर्तवला व त्यानुसार पाऊस कसा राहील व शेतकऱ्यांनी या कालावधीत काय काळजी घ्यावी? याबाबतचे अनमोल मार्गदर्शन केले.

पंजाबराव डख यांचा 15 जून रोजी वर्तवलेला अंदाज

प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल म्हणजेच 15 जून 2025 रोजी हवामान अंदाज वर्तवताना म्हटले की, राज्यामध्ये 15 ते 18 जून या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असून सरींवर सरी या पद्धतीचा पाऊस पडणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी म्हटले की, सध्या जमिनीमध्ये चांगली ओल असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. जमिनीमध्ये जर एक फूट ओल असेल तर पेरणीची तयारी करण्याचा अनमोल सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला. तसेच पावसाच्या बाबतीत म्हटले तर राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस हा सुरूच राहणार आहे व इतकेच नाहीतर हा पाऊस सर्व ठिकाणी एकसारखा पडणार नाही. परंतु भाग बदलत बदलत पडणार असून राज्यात पाऊस हा सुरूच राहणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले. पूर्व तसेच पश्चिम विदर्भ, दक्षिण व उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा या सगळ्या भागांमध्ये दररोज पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकदम पाऊस उघडीप देईल अशी स्थिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशा पावसामुळे शेतकरी जे काही पेरणी करतील ते व्यवस्थित प्रकारे उगवेल असे देखील त्यांनी म्हटले.

पावसात काळजी घेण्याचे आवाहन

तसेच शेतकऱ्यांसाठी त्यांनी आवाहन केले की या पावसामध्ये विजांचे प्रमाण जास्त राहणार असल्यामुळे विजांचा कडकडाट होत असताना झाडांखाली विशेष आंबा आणि लिंबाच्या झाडाखाली थांबू नये असे त्यांनी म्हटले. तसेच नारळाची उंच झाडे असतील तर त्या ठिकाणी देखील आसरा घेऊ नये. पाण्याची टाकी किंवा मोबाईल टॉवर, लोखंडी पोल इत्यादी ठिकाणी अशा परिस्थितीत थांबू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना केले. अशा ठिकाणी जास्त प्रमाणात विज कोसळते असे देखील त्यांनी नमूद केले.