नागभीड - जैवविविधता व पर्यटनाने संपन्न तालुका
नागभीड :: नागभीड हे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. नागपूर-चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या ठिकाणाचे हे मध्यवर्ती ठिकाण आहे. सोबतच गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यांच्या सीमासुध्दा नागभीडच्या जवळच आहेत आणि म्हणून चार ते पाच जिल्ह्यांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून नागभीडची ओळख आहे. हिच बाब लक्षात घेऊन इंग्रजांनी या ठिकाणी रेल्वे प्रशासनासाठी विस्तृत अशी जवळपास (५५० एकर) साडे पाचशे एकर जमिन राखीव ठेवून रेल्वे मार्गाची निर्मिती करून रेल्वे जंक्शनचे ठिकाण बनविले. स्वातंत्र्यपूर्व काळात नागभीड तालुक्यात इंग्रजांचे वास्तव्य होते व त्यांनी या तालुक्याचे महत्त्व लक्षात घेऊन याठिकाणी लोकोपयोगी कामेसुध्दा केलेली आहेत.
नागभीड तालुका हा नैसर्गिक साधनसंपत्तीने व्यापलेला आहे. हा तालुका जंगलव्याप्त तालुका म्हणूनसुध्दा ओळखला जातो. या तालुक्यात जंगलाचे एकूण क्षेत्रफळ ३३,३२९ चौ. मी. इतके आहे आणि म्हणूनच नैसर्गिक जैवविविधता याठिकाणी दिसून येते.
जैव विविधता : या भागात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे जैवविविधतेच्या बाबतीत नागभीड तालुक्याला एकप्रकारे पर्वणी मिळालेली आहे. तालुक्यातील एकूण जंगल क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या वनऔषधी व इमारती लाकुड उपलब्ध आहेत. औषधी वनस्पत्तीचा जर विचार केला तर यात आवळा, हिरडा, बाभुळ, सफेद मुसळी, शतावरी, भुईनिंब, बेहडा, बेल, कुडा, खोबर मुळी, गोंगल मुळी इत्यादी जवळपास शंभर ते सव्वाशे प्रकारच्या औषधी वनस्पत्ती या जंगल परिसरात उपलब्ध आहेत. वैद्यकीय सुविधा विकसीत झालेली असतांनासुध्दा प्राथमिक व तात्काळ उपचार म्हणून बहुतांश ग्रामीण भागात वनऔषधांचा वापर केला जातो. आजही आधुनिक साधनांचा वापर करून जंगली वनऔषधांचा वापर कित्येक आजार बरे करण्यासाठी केला जात आहे.
वनराईने नटलेला हा तालुका आहे व यात फक्त वनस्पत्ती व जंगलच नाही तर फार मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा सुध्दा वावर येथील जंगलामध्ये आहे. चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळख आहे व त्यात नागभीड तालुक्यातील जंगलांमध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचसोबत बिबट, रानगवा, हरीण, सांबर, निलगाय, अस्वल, ससा, कोल्हा, बारहसिंगा, मोर, रानकुत्रा, इत्यादी प्राण्यांसोबत विविध प्रकारच्या पक्ष्यांचा वावर या जंगल परिसरात पहायला मिळतो. तसेच विशिष्ट हवामानात स्थलांतरित पक्षी सुध्दा मोठ्या प्रमाणात जलसाठ्यांच्या परिसरात आढळतात. या सर्व बाबींमुळे पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी,पर्यटक, अभ्यासक व सर्पमित्र या परिसरात भेट देत असतात. त्यामुळे पर्यटनालासुध्दा चांगली चालना मिळालेली आहे. अशाप्रकारे नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे व याचे संरक्षण वनविभाग व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केले जाते. जैवविविधता या वैशिष्ट्यांसोबत या तालुक्यात प्राचीन व ऐतिहासिक पर्यटन स्थळेसुध्दा फार मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करीत असतात. यात पुढील ठिकाणांचा समावेश आहे.
पांडव गुफा : नागपूर - नागभीड महामार्गावरील मोहाळी (मोकासा) या गावापासून एक किमीच्या अंतरावर कुनघाडा चक येथे प्राचीन पांडव गुफा अजूनही आहे. या गुफेमध्ये पाच खोल्या एकाच दगडाच्या छताखाली कोरलेल्या आहेत.
परिसरात असणाऱ्या पांडवगुफेच्या अस्तित्वावरून प्राचीन काळात या ठिकाणी पांडवांचे वास्तव्य राहिलेले आहे ही बाब स्पष्ट होते व शेजारील कुनघाडा चक गावातील पूर्वजांनी तशी माहिती आपल्या पुढच्या पिढीला दिली आहे. गावकऱ्यांच्या पुढाकाराने या परिसरात मंदीराची निर्मिती केलेली आहे व पांडव गुफेचे संरक्षण व संवर्धन ग्रामसमितीच्या माध्यमातून केले जाते.
अड्याळ टेकडी : हे ठिकाण ब्रम्हपुरी - नागभीड तालुक्याच्या सीमेवरील मध्य ठिकाण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिष्य तुकाराम दादा गीताचार्य यांचे वास्तव्य या टेकडीवर राहिलेले या ठिकाणाला भू-वैकुंठ आत्मानुसंधान केंद्र, अड्याळ टेकडी या नावाने ओळखले जाते.
या ठिकाणी एक निवासी विद्यालय सुध्दा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जे साहित्य रचलेले आहे त्याची निर्मिती या ठिकाणी केली जाते. हे ठिकाण नागभीड-ब्रम्हपुरी महामार्गावर मेंढा (किर.) या गावावरून दक्षिणेस २ किमी. अंतरावर आहे. याठिकाणी उन्हाळ्यात विद्यार्थ्यांकरिता विशेष जीवनशैलीवर आधारित संस्कार शिबिरांचेसुध्दा आयोजन केले जाते.
गायमुख :- प्राचीन व रहस्यमय ठिकाण म्हणून या पर्यटन स्थळाची ओळख आहे. या ठिकाणी अगदी प्राचीन काळापासून एक पाण्याचा झरा नैसर्गिकरित्या तयार झालेला आहे व तो झरा सतत वाहत असतो. आजपर्यंत अनेक संशोधने झालीत परंतु या झऱ्याचे स्त्रोत कुठून आहे याबाबीचा शोध अजूनही लागलेला नाही.
त्यामुळे हे ठिकाण परिसरातील जनतेचे श्रध्देचे ठिकाण झालेले आहे व त्यातूनच पुढे परिसरातील जनतेच्या पुढाकाराने या ठिकाणी हनुमान मंदीराची निर्मिती करण्यात आलेली आहे. साक्षात बजरंगबली म्हणून परिसरातील लोक मोठ्या श्रध्देने या ठिकाणी दर्शनाला येतात. मकर संक्रांतीच्या दिवशी हजारो भाविक या ठिकाणी स्नान करण्यासाठी व दर्शनासाठी येतात. हळूहळू या ठिकाणाची प्रसिध्दी सगळीकडे झालेली आहे व फार दूरवरून पर्यटक व भाविक या ठिकाणी वर्षभर येत असतात.
कोरंबी धबधबा :- नागभीड तालुक्यात जंगल व डोंगर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत परिसरात अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधब्यांची निर्मिती होत असते व त्यामुळे परिसराचे नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते. नागभीड पासून साधारण १० किमी.
अंतरावर कोरंबी हे गाव आहे. चारही बाजुंनी जंगल व डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात या गावाच्या सुंदरतेत भर पडते. गावाच्या शेजारी अनेक छोटे-छोटे धबधबे व पाण्याचे ओढे तयार होतात, हे नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये पर्यटक फार मोठ्या संख्येने इथे येत असतात. गेल्या सात-आठ वर्षांत आता तालुक्यातील पर्यटन स्थळांमध्ये आणखी भर पडली.
कटाड्या मारूती मंदीर : नागभीड जवळच सुमारे ३ किमी अंतरावर नवखळा-डोंगरगांव (बुज) येथे जागृत हनुमानाचे देवस्थान आहे.
त्याला सर्व भाविक कटाड्या मारूती असे म्हणतात. परिसरातील भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने हनुमान जयंतीच्या दिवशी येत असतात.
या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले असते. तसेच दर शनिवारी बहुसंख्य भाविक श्रध्देने येत असतात.
घोडाझरी : ब्रिटीशकालीन इतिहासाचा वारसा लाभलेले घोडाझरी तलाव गेली अनेक दशकांपासून विदर्भातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेले आहे.
घोडाझरी तलावाची निर्मिती ही ब्रिटीशकालीन आहे. प्राप्त माहितीनुसार नागभीड तालुक्यात ब्रिटीशांचे वास्तव्य हे एकांत स्थळी रहावे या उद्देशाने ब्रिटीशांनी या ठिकाणी विश्रामगृहाची निर्मिती केली व त्याच बरोबर परिसरातील शेतकऱ्यांची सिंचनाची सोय व्हावी या उद्देशाने सभोवताली असणाऱ्या डोंगर दऱ्यातील पाणी अडवून व त्या भागाचे खोलीकरण करून चंद्रपूर जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या तलावाची निर्मिती करण्यात आली.
या प्राचीन तलाव निर्मितीचे कार्य १९०५ मध्ये सुरू झाले व १९२३ ला पूर्णत्वास आले. तेव्हापासून सतत नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील जवळपास ६५ गावातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झालेली आहे. घोडाझरी तलाव हे सिंचन उपयोगी असले तरी २००३ पासून महाराष्ट्र राज्य पर्यटन वीकास महामंडळ च्या माध्यमातून व राजकमल टुरिझम प्रा. लि. च्या माध्यमातून माजी आमदार अविनाश वारजुकर व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांच्या पुढाकाराने या ठिकाणाला पर्यटन स्थळाची मान्यता मिळाली व विदर्भातील पर्यटकांना मेजवानी मिळाली. या पर्यटन स्थळाच्या माध्यमातून बोटींग सेंटर, चिल्ड्रन पार्क, विश्राम गृह, उपहार गृह व निसर्ग पर्यटनाची सोय उपलब्ध झाल्याने वर्षाकाठी लाखो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात व नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटतात. बरेचदा पर्यटकांना जंगली प्राण्यांचे दर्शनसुध्दा होतात हे विशेष.
सात-बहिणी डोंगर (सोनापूर) : नागभीड व चिमूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सोनापूर गावालगत सातबहिणी पर्वतरांगा ह्या प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहेत. त्या ठिकाणी नागरगोटा या नावाने प्रसिध्द असलेले चित्रशैलगृहे आजही अस्तित्वात आहेत व टेकडीवर भगवान शंकरजीचे मंदीर आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी हजारो भाविक दर्शनाला येतात.
पर्यटनाच्या व गिर्यारोहणाच्या दृष्टीने या स्थळाचे महत्व गेल्या अनेक वर्षांपासून वाढलेले आहे. पावसाळा व हिवाळ्याच्या दिवसात येथील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची व गिर्यारोहकांची रेलचेल असते. या ठिकाणी ग्रामसमिती व वनविभागातर्फे पर्यटकांना व गिर्यारोहकांना वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देऊन नियंत्रण ठेवले जाते.
देवटक (हेमाडपंथी मंदीर) : नागभीड पासून जवळपास ६ किमी. अंतरावर देवटक हे गांव असून तेथे प्राचीन हेमाडपंथी मंदीर प्राचीन इतिहासाची व संस्कृतीची आठवण करून देत आहे.
सध्या या मंदीराच्या सुरक्षिततेची व मंदीराचे जतन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभाग, छत्रपती संभाजी नगर यांचेकडे आहे.
विठ्ठल मंदीर : नागभीड नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी प्राचीन विठ्ठल मंदीर ची निर्मिती करण्यात आलेली आहे. याठिकाणी विठ्ठल-रूख्मिणी ची स्वयंभू मूर्ती मिळाली व शेकडो वर्षांपूर्वी त्याचठिकाणी या मंदीराची निर्मिती करण्यात आलेली आहे. या मंदीराचा प्रथम जिर्णोध्दार श्री. धुंडीराज गणेश भांदककर यांनी सन १९०२ मध्ये म्हणजेच आजपासून जवळपास (१२५) सव्वाशे वर्षांपूर्वी केला. श्री. विठ्ठल व रूख्मिणीची एकत्र मूर्ती असणाऱ्या फार कमी मंदीरांपैकी नागभीड येथील प्राचीन विठ्ठल मंदीराची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात आहे. आषाढी एकादशी व कार्तिक पौर्णिमेला याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. व त्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन असते. हे मंदीर नागभीडकरांचे श्रध्दास्थान असून अनेकांचे आराध्य दैवत आहे.
श्रीराम मंदीर : नागभीडच्या नगर रचनेचा जर विचार केला तर आज ज्या ठिकाणी श्रीराम मंदीरची निर्मिती करण्यात आलेली आहे, ते ठिकाण निर्जन, व दुर्लक्षित ठिकाण होते. परंतु नागभीडचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजनजी जयस्वाल यांनी आपल्या स्वमालकीच्या ठिकाणी नागपूर-गडचिरोली महामार्गाच्या अगदी बाजुला श्रीराम मंदीरचे बांधकाम केले.
तेव्हापासून या परिसरात फार मोठ्या प्रमाणात लोकवस्ती सोबतच व्यापारी संकुलांची निर्मिती झाली तसेच महत्वाचे सरकारी कार्यालये या मार्गावर तयार झालेत. त्यामुळे या परिसरात सर्वत्र रेलचेल वाढली. व या परिसराला श्रीराम मंदीर चौक म्हणून ओळख निर्माण झाली. श्रीराम नवमी म्हणजेच प्रभु श्रीरामाचा जन्मोत्सव याठिकाणी मोठ्या उत्साहात साजर केला जातो.
निसर्गायन :- नागभीड शिवटेकडीच्या पायथ्याशी दक्षिणेस देवतलावाच्या बाजुला जयस्वाल परिवाराने पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या परवानगीने 'निसर्गायन' रिसोर्टची निर्मिती केली.
त्याठिकाणी निवास व्यवस्था, उपहार गृह, चिल्ड्रन पार्क, मिटींग हॉल व मोठ्या कार्यक्रमाकरीता भव्य अशा लॉनची व्यवस्था आहे. याठिकाणी पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आलेली असून येथील एक इमारत 'स्वस्तिकाकृती'ची बनविलेली आहे व दुसऱ्या इमारतीत मराठी ऋतूनुसार निवास कक्षांची निर्मिती करण्यात आलेली आहे. सभोवतालच्या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्याकरीता याठिकाणी अनेक पर्यटक मुक्कामी असतात.
शिवटेकडी : नागभीडच्या पश्चिमेला असलेल्या टेकडीवर भगवान शंकरजींचे प्राचीन मंदीर बांधण्यात आलेले आहे. या स्थळाला शिवटेकडी नागभीड ही ओळख प्राप्त झाली आहे. या मंदीराची निर्मिती शेकडो वर्षांपूर्वीची आहे, असे प्राचीन इतिहास सांगतो.
गेल्या ३०० वर्षांपासून नागभीड येथील 'कामुनवार' ह्यांचे घरून नंदीवर आरूढ भगवान शंकरजीच्या मूर्तीची 'नंदी रथयात्रा' महाशिवरात्रीच्या दिवशी नगरभ्रमण करून शिवटेकडीच्या पायथ्याशी जाते व भाविकांच्या दर्शनासाठी पुढील १० दिवस तिथेच ठेवले जाते.
शिवटेकडीच्या पायथ्याशी बृहदाश्मयुगीन प्राचीन मिनहीर (स्मृतिस्तंभ) आजही अस्तित्वात आहेत व ते प्राचीन इतिहासाची साक्ष देत आहेत.
महाशिवरात्रीला लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी शिवटेकडीवर येत असतात. गेल्या काही वर्षांत मॉर्निंग वॉक संघटनेच्या माध्यमातून या टेकडी परिसरात ५० फुट उंच शंकरजीच्या सुरेख मुर्तीची स्थापना करण्यात आली. सोबतच १२ ज्योतिर्लिंग, हनुमान मंदीर, शनि मंदीर, नवग्रह देवता अशा छोट्या-छोट्या मंदीरांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे टेकडी परिसराच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. महाशिवरात्री उत्सव जवळपास दहा दिवसांचा असतो व त्यामध्ये विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, रोगनिदान शिबीर, कृषी मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन या विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. किर्तीकुमार भांगडीया यांच्या पुढाकाराने केले जाते. गेली दहा वर्षांपासून नागभीड 'महाशिवरात्री उत्सवाला' आमदार साहेबांच्या पुढाकाराने व भोले शंकर भगवानांच्या आशीर्वादाने महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. संपूर्ण नागभीड तालुक्यातील जनता या नागभीड महाशिवरात्री महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी दूरवरून इथे येत असते. भाविक भक्तांच्या सोयीसाठी व पर्यटनाला चालना देण्यासाठी आमदार महोदयांच्या पुढाकाराने टेकडी परिसराचे सुशोभीकरण व भक्तनिवास निर्मितीच्या कार्याला सुरूवात झालेली आहे.
अशाप्रकारे जैवविविधतेने व पर्यटनाने संपन्न असलेला हा नागभीड तालुका व येथील नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय प्रशासन, विविध सामाजिक संस्था, निसर्गप्रेमी संस्था, व्यापारी मंडळ, शेतकरी व युवक संघटना पुढाकार घेत असतात.
नागभीड तालुक्याचे हे नैसर्गिक व पर्यावरणीय महत्व असेच अबाधित राखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात..
संकलन : श्री. सतिश शुकलाल मेश्राम (सहा. शिक्षक) जनता कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, नागभीड मो. नं. 7066459107